मुंबई : रिलायन्स इंडस्ट्रीजची मोबाईल सेवा प्रदाता कंपनी ‘जिओ’ने या आर्थिक वर्षात सातशे २३ कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. मार्च अखेर संपलेल्या चौथ्या तिमाहीत तिने पाचशे १० कोटींचा नफा कमावला आहे. नुकतेच कंपनीचे मार्च अखेर तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करण्यात आले. त्या वेळी ही माहिती देण्यात आली.
जिओने सुरुवातीला सर्वात स्वस्त आणि मोफत डेटा सेवा दिल्यामुळे ‘जिओ’ची ग्राहकसंख्या झपाट्याने वाढली. आता १८ कोटीपेक्षा जास्त ग्राहक आहेत. डेटाचा वापर वाढवण्यासाठीही कंपनीचे मोठे योगदान आहे. जिओच्या डेटा सेवेत १७.४ टक्क्याने वाढ नोंदवण्यात आली आहे, तर या तिमाहीमध्ये पाचशे सहा कोटी जीबी डेटाचा वापर झाला आहे.
या वेळी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले, ‘जगभरातील सामाजिक, मोबाईल आणि डिजिटल क्रांतीची प्रगती होत आहे. भारत यात मागे राहिला नाही याचा मला आनंद आहे. जिओमधील प्रत्येकजण आज अभिमानाने देशाच्या डिजिटल लँडस्केपचे रुपांतर करण्यात महत्वाची भूमिका बजावत आहे. सर्व प्रमुख डिजिटल साधने आणि कौशल्यांसह लाखो भारतीयांचे सक्षमीकरण करीत आहे. प्रत्येक स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी आणि भारताला ग्लोबल डिजिटल लीडरशीपमध्ये पुढे नेण्यासाठी प्रत्येक भारतीयाला जिओ ‘पॉवर ऑफ डेटा’ अर्थात डेटाची ताकद पुरवत आहे.’